Links

Sunday 14 July 2013

गर्दीत वाट हुडकतोय....

रोज सकाळ होते, मी जागा होतो, पूर्वीही सकाळ व्हायची मी जागा व्हायचो.
उठून शाळेत जायचो, गर्दीत सामील व्हायचो, बे एके बे पासून १० वि पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो,
लोक वक्तृतव स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो, आणि अमुक एक क्लास चांगला आहे म्हणून मी पण जात राहिलो.

शाळा झाली, सगळे ११ वी / १२ वी करतात म्हणून मी ही केली, सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो. शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो. ........................
१२ वी नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो.
अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एमनसी कंपनीमधे असते , इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो, मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो.
अरे तो यूएस ला गेला, हा यूके हून आला , तो युरोप मधे सेट्ल झला हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो. सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्री मधे उभा राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो............................लहान पणापासून गर्दीचा संस्कार झालेला मी असाच आयुष्यात वाहत गेलो. माझेही इंडक्षन झाले , काम झाले, कष्ट झाले , अप्रेज़ल झाले, मॅनेजर ला शिव्या देणे झाले, ३/४ स्विच झले, पॅकेज वाढले.

मी एक पक्का सॉफ्टवेर इंजिनियर झालो. मी पुर्वी पंकज द्वारकानाथ मोहोटकर मधला "पन्या / पंक्या" होतो आता "पी. एम." झालो आहे. आता सगळ्या गोष्टी पैश्यात मोजू लागलो आहे. एक दिवस लक्ष्यात आले की मी गर्दीत आहे खरा, पण मला कोणी जवळचा नाही, वीकेंडला रस्त्यात कुठे भेटेल तिथे उभे राहून माझ्याबरोबर ३/४ तास गप्पा मारणारा मित्र नाही. मी पण आता अगदी मित्रच नसले तरी पण कलीग बरोबर रिकामा वेळ घालवतो, वीकेंड ला फालतू गप्पा आणि लंच/ डिनरसाठी तडफडतो.

घरात पण मी नसतो कारण रोज १२ / १३ तास गर्दीत असतो, २ दिवस मिळतात म्हणून घरातले वीकेंड ला मला “जाउ दे त्याला निवांत” महणून सोडून देतात. असा मी आज काल गर्दीत असलो तरी एकटाच असतो.
आज काल मी टिपिकल सॉफ्टवेरवाला झालो आहे, माझी कंपनी, माझे पॅकेज, माझे डेसिग्नेशन, माझा वेरियबल, माझा बुक केलेला फ्लॅट, त्याचे प्रोग्रेस मधील फोटो, माझी यूके वारी त्याचे तेच ते पकाव पीकासा वरचे आल्बम, माझी कार………..सगळ्याना दाखवत बसतो…. पण का काही कळत नाही कुठे तरी मनात कुरकुरतो, …....

मला ढीग भरून स्क्रॅप येतात, ऑरकूट / फेसबुक वर शेकडो फ्रेंड्स भेटतात, सगळे स्क्रॅप शेवटी केरात जातात आणि फ्रेंड्स हे फक्त फ्रेंड्स राहतात. त्यातलाच कोणी काय भावा कुठे असतोस ये की चा मारू हे बोलत नाही, आणि आज काल आई-आप्पा कुठं तुझ्याकड की गावाकड असले प्रश्न पण विचारत नाही. कोणी फोन करून लेका गावाकड ये कि एकदा, किंवा यंदा तरी जत्रेला ये कि भावा असे पण म्हणत नाही, मला कोणीच ऑरकूट वरचा ये की मर्दा घराकड एकदा जेवाय असे पण म्हणत नाही,आम्ही ढीग आउटिंग /पार्ट्या करतो पण त्याची मजा यात नाही. गावाकडे आहेत काही मित्र, पण मी तिकडे जात नाही, आज कुठे तरी हुरहूर वाटते आहे की मी माझे पक्के दोस्त गमावल्याचे, ते गावाकडचे असले म्हणून काय झाले त्या हाकेसारखी आर्तता इथल्या फ्रेंड्सच्या इंवीटेशन मध्ये जाणवत नाही.

लोकही माझे मेल/स्क्रॅप/ पीकासा आल्बम पाहतात आणि ते पण; “च्यायला हा ऑनसाइट जाऊन आला वाटते” असे म्हणत फोटो न बघता लॉग ऑफ मारतात , त्याना फार आवड नसते बघायची, एखादा कॉमेंट टाकून बस गर्दीचा नियम पाळत असतात.

गर्दीत राहून पण मी आज एकटा आहे………नावाला फक्त लोक गर्दीत उभे आहेत, आयुष्यात एक वेळी अशी येते की ही गर्दी कामात येत नाही, कलीग म्हणणारे तुमचे जवळचे तुमच्या सुखात नक्की एन्जॉय करायला येतील, पण दुखा:च्या वेळची ग्यारेंटी नाही.